प्रवरामाई ला गंगेचे रुप आणण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी एकत्र या
प्रवरामाई च्या यातना संगमनेरकरांना कधी कळणार..?
संगमनेर(प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावणारी प्रवरा नदी पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली. दुसरे महायुद्ध सुरू असतांना इंग्रज सरकारने भंडारदरा येथे धरण बांधले. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना आणि येथील उद्योगांना मिळु लागले. त्यातील डावा आणि उजव्या कालव्यामुळे हे पाणी सर्वत्र फिरले. प्रवरा नदीच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळु लागले. प्रवरा नदीवर अकोले,संगमनेर,श्रीरामपूर,नेवासा असे तालुक्याची ठिकाणे असुन छोटे मोठे गावे आणि शहरं आहेत. त्यांना नियमित पाणी पुरवठा करणारी प्रवरा आता अमृतवाहिनी झाली आहे. पण याच गंगेला आता गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाढत्या आधुनिकतेच्या जगात मानवनिर्मित सांडपाणी, घनकचरा, शहरातील गटारे, साखर कारखान्याचे दूषीत पाणी, दूध कारखान्याचे सडलेले पाणी, नदीच्या कडेला असलेले स्वच्छता गृह यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे.
नदी पात्रातील अमर्याद वाळु उपसामुळे पात्रातील खड्यात गटारीचे डबके निर्माण होत आहे. आणि याच डबक्यातील पाणी पाझरुन पात्रातील विहीरीत उतरत आहे. संगमनेरातील म्हाळुंगी नदी तर गटार नालाच झाली आहे. आणि नाटकी नाल्यातुन अनेक उद्योगाचे विषारी सांडपाणी आणि रक्तमिश्रित पाणी नदी पात्रात वळविले गेले आहे. हे पाणी नदीतील अनेक विहिरीत पाझरत आहे. आणि सायपन पाईप लाईनच्या माध्यमातून ते शेतात पोहोचल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत पिकांची नासाडी होत शेतकऱ्यांना धास्तावण्याची वेळ येईल तसे धरणातुन गोड पाणी सोडले असतांना पुढे ते खारट का होते ह्याचा शोध घेण्याची गरज आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. संगमनेर च्या पूर्वेकडील भागातील विहिरींना हे प्रदूषीत पाणी उतरल्याने तेथील नागरीकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. नदी प्रदूषित होण्यामागे मोठे राजकीय हस्तक असल्याने प्रवरा माई चे सौंदर्य पुन्हा प्राप्त होईल याची किंचितशीही शक्यता वाटत नाही.
संगमनेर हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. येथील धार्मिक परंपरा व संस्कृती ही जगात नावाजलेली आहे. यात जोर्वे संस्कृतीचा प्रभाव मोठा आहे. हीच जोर्वे संस्कृतीची साक्षीदार माझी प्रवरा माई आहे. पण तीचे लक्तरे तोडणारे येथीलच तीच्या कुशीत वाढलेले तिचेच 'सुपुत्र' नव्हे नव्हे तर 'कुपुत्र' प्रवरा नदी वर भंडारदरा धरण झाले. कोकणकड्यावरुन सह्याद्रीच्या शुद्ध कुशीतून ही शुद्ध जलधारा वाहून काठावरील गावांसह आजूबाजूच्या कोसो मैल गावांची तहान भागवत आहे. म्हणून तर या नदीला आमचे वाडवडील प्रवरा नदी नव्हे तर "प्रवरामाई" म्हणून गौरवपूर्ण बोलत होते. परंतु काही दशकांपासून या तालुक्यात काही लोकांच्या राजाश्रया मुळे या नदीला जी कधीकाळी माई म्हणून संबोधले जात होते तिला आज गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याला कारणीभूत आहे प्रत्येक संगमनेरकर.
संगमनेर ला बाहेर गावाहून आलेले अधिकारी हप्ता घेऊन तस्करांना प्रवरेचा विध्वंस करण्याचे तोंडी मान्यता देतात. संगमनेर कर ही गोष्ट उघड्या डोळ्यांनी बघतात. परंतु गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवल्यासारखे प्रवरेची कुस उजाड होत असलेलं महाभारत तिला काय दिसणार. संगमनेरात या प्रवरा माईचे अस्तित्व नष्ट करु पाहणारे कौरवांना व त्यांच्या त्या दुर्योधनाला संगमनेरकरांनी महाभारत दाखविले पाहिजे आणि ही आता काळाची गरज आहे. कारण या गांधारीच्या गचपणांनी दुर्योधनाच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी माझ्या प्रवरा माई चे वस्रहरण केले आहे.
संगमनेर करहो जागे व्हा....पुन्हा सिद्ध होण्याची वेळ आली आहे...'सौ शहरी, एक संगमनेरी'
लेखक: सहदेव जाधव
Comments
Post a Comment